शिंदे गटातील ‘या’ आमदाराची मातोश्रीला परतण्याची विनवणी; मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का!

दक्ष पोलिस न्यूज प्रतिनिधी (मुंबई) : शिवसेनेचे 40 आमदार फुटून शिंदे गटात सामील झाले होते. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने त्यांनी राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र, शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची माहिती मिळाली आहे. शिंदे गटातील 22 आमदार आणि 9 खासदार पक्ष सोडणार असल्याची माहिती मिळाली आहे. खासदार गजानन कीर्तिकर यांनी माध्यमांशी बोलत असताना नाराजी व्यक्त केली आहे. तेव्हापासून राजकीय वर्तुळात या चर्चांना उधाण आलं आहे. कीर्तिकर म्हणाले, “भाजपकडून शिंदे गटाच्या खासदारांना वाईट वागणूक मिळत आहे. त्यामुळे आता शिंदे गटातील अन्य नेतेही बोलणार आहे.”
जितेंद्र आव्हाड यांनी देखील या पार्श्वभूमीवर विधान केलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार मातोश्रीवर परतण्याच्या तयारीत असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “आमदार बालाजी किनीकर मातोश्रीवर परतण्यासाठी प्रयत्नशील आहे. मी आज सांगत आहे की, बालाजी किणीकर आत्ताच बॅग भरा, तुम्हाला घरी परत जायचं आहे. दरम्यान, शंभूराज देसाई यांनी पंधरा दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंकडे निरोप पाठवला होता. शिंदे गटामध्ये आमची गळचेपी होत असल्याची माहिती देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना दिली होती. त्याचबरोबर गजानन कीर्तिकर आणि तानाजी सावंत यांनी देखील असंतोष व्यक्त केला. शिंदे गटात गेलेल्या आमदारांची आणि खासदारांची कोंडी झाली आहे, असा दावा विनायक राऊत यांनी केला.



